जालना: धनत्रयोदशीला वरुणराजाचे आगमन, खरेदीसाठी निघालेल्यांची झाली तारांबळ

Foto

जालना – ऑक्टोबर हिटने हैरान झालेल्या जालनेकरांना धनत्रयोदशीला वरुणराजाने चिंब केले. सोमवारी सकाळपासून जालना शहर आणि परिसरात पावसाचे येणे-जाणे सुरु होते. दुपारी मात्र सलग तासभर पाऊस कोसळला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

 

दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना अचानक आलेल्या पावसाने चिंब केले. यामुळे महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांची तारांबळ उडाली. सोमवारी सकाळपासून जालना शहर आणि परिसरात पावसाची हजेरी राहिली. जूनपासून सप्टेंबरपर्यंत डोळे वटारलेल्या पावसाने शेतकऱ्यांची मोठी निराशा केली. या बेमोसमी पावसामुळे काही अंशी का होईना पिकांना दिलासा मिळू शकतो. जिल्ह्याच्या इतर भागात ही ऐन दिवाळीत पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.